मुंबईतील म्हाडाच्या या 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये । mumbai home

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे (mumbai home) काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या घरांचा ताबा देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केले होते. मात्र काही कारणाने कामास विलंब झाल्याने बीडीडीवासीयांची घराची प्रतीक्षा लांबली आहे. आता या 550 घरांच्या ताब्यासाठी मार्च 2025 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव येथील तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत 15,593 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात येणाऱ्या 33 पैकी 12 पुनर्वसित इमारतींची कामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी दोन इमारतींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यात 550 घरांचा समावेश आहे.

उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करून इमारतींना निवासी दाखला घेत घरांचा ताबा देऊ असे मंडळाकडून सांगितले जात होते. पण आता मात्र दोन्ही इमारतींची कामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याने 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होणाऱ्या घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये देण्याचे नियोजन असून वरळीच्या बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक 30, 31 आणि 36 मधील पात्र 550 रहिवाशांना या घरांचा ताबा दिला जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा

2025 मध्ये टप्प्याटप्प्याने जशी कामे पूर्ण होतील. तसतसा घरांचा ताबा देण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार मार्च 2025 मध्ये 550 घरांचा ताबा दिल्यानंतर पुढील तीन महिन्यांत आणखी काही घरांचा ताबा दिला जाणार आहे. तर पुढे प्रत्येक तीन महिन्यांनी बीडीडीवासीयांना घराचे वितरण केले जाणार असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती

1 thought on “मुंबईतील म्हाडाच्या या 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये । mumbai home”

Leave a Comment